अन्नधान्य वितरण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आनंदाचा शिधा गहाळ झाल्याची अधिकाऱ्याची कबुली…
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
महाराष्ट्रात आनंदाचा शिधा गोरगरीब नागरिकांना सणासुदीला महायुतीच्या सरकारमध्ये २०२२ पासून आधी दिवाळी आणि त्यानंतर गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती या सणात सवलतीच्या दरात ‘आनंदाचा शिधा’ देण्यात येतो. यात १०० रुपयांमध्ये प्रत्येकी एक किलो साखर, रवा, चणाडाळ आणि तेल देण्यात आले होते. त्यात आनंदाचा शिधा वाटप प्रक्रियेत लाखो रुपयांचा शिधा गहाळ झाल्याची असल्याने खुद्द प्रशासनावर भ्रष्टाचार झाल्याचा संशय होत आहे. आनंदाचा शिधा गहाळ झाला म्हणजे कोणी पळवला ?
सणासाठी आनंदाचा शिधा वितरित करण्याचे ठरविले होते. मात्र, पुणे शहरातील वाटपासाठी असलेला आनंदाचा शिधा गहाळ झाल्याने तीन दुकानांना शिधाचे वितरण झाले नाही. याची तक्रार झाल्यानंतर अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून हा आनंदाचा शिधा खुल्या बाजारातून खरेदी करण्यात आला व या तीन दुकानांमधील ग्राहकांना निर्धारित तब्बल तीन महिने वेळेपेक्षा उशिराने वितरित करण्यात आला. हा शिधा गहाळ कसा झाला व तो खरेदी कसा करण्यात आला? याबाबत अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांचे आळीमिळी गुपचिळी असे धोरण असल्याचे दिसत आहे.
गौरी-गणपतीमध्ये देण्यात येणारा ‘आनंदाचा शिधा’ तीन महिन्यांनंतरही पर्वती मतदारसंघातील काही दुकानांपर्यंत पोहचला नव्हता. यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर अन्नधान्य वितरण विभागाकडून खुल्या बाजारातून धान्य खरेदी करून संबंधित दुकानदाराकडे पोहच केले आहे. हे धान्य कोणत्या निधीतून खरेदी केले आहे, याबाबत वितरण विभागाच्या वतीने मौन बाळगण्यात आले आहे.

आचारसंहितेमुळे दिवाळीचा ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात आला नाही. मात्र, त्याआधीचा ‘आनंदाचा शिधा’ सुद्धा ग्राहकापर्यंत मिळाला नसल्याने अनेक तक्रारी करण्यात येत होत्या, पर्वतीमधील काही रेशन दुकानांत ‘आनंदाचा शिथा’ मिळाला नसल्याने तक्रारी आल्या होत्या. याचबरोबर रेशन दुकानदार संघटनेच्या वतीने प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात आला. यानंतर वितरण विभागाला जाग आली. गौरी-गणपतीत देण्यात येणारा ‘आनंदाचा शिधा गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. यानंतर खुल्या बाजारातून रवा, साखर, तेल आणि डाळ खरेदी करून पर्वती दर्शन येथील इंदिरा महिला मंडळ, बिबवेवाडीतील माननीय महिला मंडळ आणि बी. के. सुतारनगर येथील दुकानात १८ डिसेंबर रोजी पोहचविण्यात आले. हे अन्नधान्य कोणत्याही निधीतून खरेदी केले आहे, याबाबत विचारणा केली असता अन्नधान्य वितरण विभागाच्या वतीने मौन बाळगण्यात आले आहे. अशाप्रकारे धान्य गहाळ झाल्यानंतर खुल्या बाजारातून खरेदी करून वाटप करण्यात आल्याची राज्यातील पहिलीच वेळ असेल. याबाबात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
रेशन दुकानदारांना वाटप करताना धान्य गहाळ झाल्याचे अन्नधान्य वितरण विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, त्याबाबत प्रशासनाला कळविण्यात आले होते का? अशी तक्रार केली आहे. –
गणेश डांगी, शहराध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना



